ते स्वभावाने फटकळ आहेत पण…

ते स्वभावाने फटकळ आहेत पण…

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचा आज ६५ वा वाढदिवस. आपल्या कामाबरोबरच मनमिळवू स्वभावामुळे सर्वपक्षीय मित्रपरीवार आहे. मागील काही काळापासून भाजपा विरुद्ध शिवसेना असा संघर्ष सुरु असल्याने दोन्ही पक्षांकडून आणि त्यांच्या नेत्यांकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. मात्र आज हे आरोप प्रत्यारोप बाजूला ठेवत शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी नितीन गडकरींचं तोंडभरुन कौैतुक केलं. आजपासून कोल्हापूर दौऱ्यावर असणाऱ्या राऊत यांनी गडकरींना शुभेच्छा देताना मोदी सरकारकडून जो विकास दाखवला जातोय त्यापैकी ९० टक्के कामं गडकरींनी केल्याचं म्हटलंय.

“जो विकास दिसतोय ज्या विकासाची चित्र दाखवली जातायत त्यापैकी ९० टक्के काम नितीन गडकरींचं आहे. रस्ते असतील, उड्डाणपूल असतील. अगदी देशाच्या सीमेपर्यंत काम केलंय. उत्तम रस्ते तयार झालेत, उड्डाणपूल तयार झालेत, दळणवळणाची साधने तयार झालीयत, याचं श्रेय नितीन गडकरींनाच द्यावं लागेल,” असं म्हणत राऊत यांनी गडकरींचं कौतुक केलंय.

“साधा माणूस आहे पण विकासाचा दृष्टीकोन आहे. विकासाची दृष्टी असलेला आणि विकासाच्या कामात राजकारण न आणणारा राष्ट्रीय शरद पवार यांच्यानंतरचा जर कोणी नेता असेल तर नितीन गडकरी आहेत,” असंही राऊत यांनी म्हटलंय. तसेच, “ते (गडकरी) महाराष्ट्राचे आहेत म्हणून मला सदैव त्यांचा अभिमान आहे. देशाच्या विकासात महाराष्ट्राचं योगदान काय हे नितीन गडकरींनी मागील सात वर्षात केलेल्या कामातून स्पष्ट दिसेल,” असंही राऊत यांनी गडकरींचं कौतुक करताना म्हटलंय.

“गडकरी हे भाजपाचे नेते असले तरी प्रत्येक राजकीय पक्ष आणि नेता हा त्यांचा चाहता आहे. टीका टीप्पणी होत असते पण गडकरींच्या टीका टीप्पणीमध्ये कधी विखार नसतो. ते स्वभावाने फटकळ आहेत पण मानाने निर्मळ आहेत. मी त्यांना माझ्यातर्फे, माझ्या पक्षातर्फे उदंड, निरोगी दिर्घायुष्य चिंतितो,” असं राऊत म्हणालेत.

दरम्यान, कोल्हापूर दौऱ्याबद्दल बोलताना राऊत यांनी, “कोल्हापूरची जाबदारी माझ्यावर पक्षप्रमुखांनी दिलीय. तीन दिवस मेळावे, बैठका, शिवसंपर्क अभियानाच्या माध्यमातून पक्षवाढीसाठी प्रयत्न करु” असं म्हटलं आहे.